Dr. Vidyadhar Bapat

+91 98504 15170 . Pune . India


आयटी क्षेत्रातील ताणतणाव

 

दिवसेंदिवस वाढत चाललेले आयटी क्षेत्रातील ताणतणाव आता गंभीर स्वरूप धारण करत चाललेत. सकाळी लवकर जायचं, रात्री उशिरापर्यंत थांबायचं, डेडलाइन्स, पुढे जाण्यासाठीची जीवघेणी धडपड आणि त्यासाठी प्रसंगी तब्येतीची आणि निकोप नात्यांमधली हेळसांड हे विलक्षण दुष्टचक्र आहे. सुजय माझ्या मित्राचा मुलगा. देखणा हुशार. कॉम्प्युटर इंजिनियर. त्याची पत्नी अर्पिता गोड, सालस मुलगी. तीही कॉम्प्युटर इंजिनिअर.

दोघंही आयटी कंपन्यांमध्ये हिंजवडीला काम करणारे. वर्षभरापूर्वीच लग्न झालेलं. भरपूर पगार, स्वतंत्र कार्स. वेल फर्निश्ड सोयीसुविधांनी सुसज्ज घर. खरोखरच अचानक दृष्ट लागावी तसं घडलं. वर्षभरापूर्वी त्यांच्या लग्नात दोघांनाही पाहिलं होतं. उत्साहानं ओसंडून वाहणारी प्रसन्न अशी ती व्यक्तिमत्त्वं होती आणि आज माझ्यासमोर बसलेला सुजय विलक्षण थकलेला, निरुत्साही दिसत होता. अर्पिताही विलक्षण थकल्यासारखी वाटत होती. मी नीट न्याहाळत होतो. काहीतरी घडलं होतं हे निश्चित.

शेवटी अर्पितानं कोंडी फोडली. ‘‘सर, सध्या आम्हाला दोघांनाही प्रचंड अस्वस्थ वाटतंय. ताण खूप वाढलाय. ऑफिसमधला आणि आमच्या दोघांच्या रिलेशनमधलाही. याची सारखी चिडचिड चालू असते. कधीकधी आठ-आठ दिवस अबोला असतो. एकदम डिव्होर्सचीही भाषा करतो.’’ मध्येच सुजय चिडून बोलला, ‘‘अर्पिता, हे अति होतंय. सगळ्या चुका माझ्या नाहीत. तुझा अहंकार, आयुष्य जगण्याच्या चुकीच्या कल्पना याही सगळ्याला कारणीभूत आहेत.’’ माझ्या लक्षात आलं, दोघंही विलक्षण अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांना आपण काय बोलतोय याचं भान नाहीय.

मी दोघांनाही शांत केलं. मी दोघांनाही आधीपासून ओळखत होतो आणि म्हणूनच माहीत होतं, की दोघंही कुठल्यातरी विचित्र परिस्थितीत सापडले आहेत म्हणून हा गुंता निर्माण झालाय. त्याचबरोबर दोघंही निश्चितपणे अस्वस्थतेच्या आजाराचे (Anxiety Neurosis) बळी ठरलेले दिसत होते आणि नैराश्याच्याही.

आधी वैयक्तिक अस्वस्थतेची कारणं शोधायला हवी होती. External stressors (बाह्य परिस्थितीजन्य कारणं) आणि Internal stressors (आंतरिक जैविक, स्वभावजन्य इत्यादी) कारणं यांचा मागोवा घ्यायला हवा होता. त्यावरचे उपाय करायला हवे होते.

दोघांशी बोलताना अशा गोष्टी समोर आल्या -

१. दोघांवरही अतिशय ताण आहे. दोघांचीही एकाग्रता, आत्मविश्वास खूप कमी झालाय. त्याचा परिणाम performance appraisal वर व्हायला लागलाय.

२. शारीरिक तक्रारी, अशक्तपणा वाढायला लागल्या आहेत. आयुष्यातला आनंद नाहीसा झाल्यासारखं वाटतंय.

३. दोघांचाही रोजचा प्रवास जवळजवळ अडीच तासांचा आहे. तोही अतिशय हेवी ट्रॅफिकमधून. रात्री घरी यायला प्रचंड उशीर होतो. आल्यावर दोघंही विशेषत: अर्पिता विलक्षण थकलेली असते.

४. दोघांमधला संवाद संपल्यासारखाच आहे. जेव्हा एकजण पुढाकार घेतो, त्यात साध्या गप्पांमधूनसुद्धा भांडणंच होतात. मूळचे आनंदी स्वभाव चिडचिडे झालेत. थकव्यामुळे लैंगिक संबंध जवळजवळ नाहीतच. कधी जवळ आलेच, तर त्यात एकसुरीपणा जाणवतो.

५. शनिवार-रविवार सुट्टी असते; पण पूर्वी दोघंही एकत्रितपणे नियोजन करून निवांतपणा उपभोगायचे तो आनंद संपलाय. उणीदुणी काढण्यातच वेळ जातो.

६. सुरवातीपासून भरपूर कमाई असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी अवास्तव खर्च करण्याची सवय लागलीय. गरज नसताना भरपूर वस्तू आल्यात. विलासाची, चंगळवादाची सवय लागलीय; पण त्यातून अतृप्तीच जाणवते आहे. ‘माझी कमाई, तुझी कमाई, माझी ऑफिसमधली पोझिशन, तुझी पोझिशन’ यांतून असूयेची सुरुवात झालीय. त्यात दोघांचाही अहंकार खतपाणी घालतोय.

७. ऑफिसमधील, करिअरमधील ताणतणाव चोवीस तास दोघांना वेढून राहिला होता आणि त्यात दोघांच्याही स्वस्थतेला ग्रहण लागलं होतं. या सगळ्यात त्यांचं स्वत:शी आणि अन् एकमेकाशी असलेलं निकोप नातं होरपळत होतं.

काही महिन्यांत योग्य उपचारांनंतर सुजय आणि अर्पिता या अस्वस्थतेतून बाहेर आले. योग्य औषधोपचार, समुपदेशन, व्यायाम, तणावनियोजनाची तंत्रं; त्याचबरोबर आयुष्याकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोन जोपासायला शिकणं, चंगळवादी विचारसरणीला लगाम घालणं, मुख्य म्हणजे सर्वच बाबतींत कुठं थांबायचं हे कळणं, करिअरइतकंच स्वत:तल्या व इतरांमधल्या माणूसपणाला महत्त्व देणं या सगळ्या गोष्टी शिकणं दोघांसाठी आवश्यक होतं.

आज आयटी क्षेत्रात काम करणारे आणि अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स असणारे खूप सुजय किंवा अर्पिता आढळतात. सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच स्तरातील बऱ्याच तज्ज्ञांच्या वर ताणतणाव व त्याचे दुष्परिणाम वाढताना दिसत आहेत. त्याची कारणं आणि उपाय पाहू पुढच्या भागात.

 

Article published in www.esakal.com | 9 Mar. 2024